महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे:अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी

कृषि विभाग- एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

मुंबई: प्रतिनिधी 

दि.२३: “महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे, महिला शेतक-यांसाठी शासन विविध योजना व उपक्रम राबवत असून शाश्वत शेतीसाठी कृषि विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन कृषि विभागासोबत शेतकरी महिलांच्या विकासासाठी काम करत आहे, असे कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने आणि एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृह येथे महिला शेतक-यांच्या विविध विषयाच्या अनुषंगाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी बोलत होते.

           या कार्यक्रमात एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामिनाथन, शेतकरी महिला प्रतिनिधी, विविध भागातून महिलांविषयक काम करणा-या स्वयंसेवी संस्था, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदच्या महासंचालक वर्षा लड्डा, एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त कैलास पगारे, उमेद- राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर,मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्यकारी अधिकारी प्रिया खान, विधी व न्याय विभागाचे संयुक्त सचिव मकरंद कुलकर्णी तसेच महिला किसान अधिकार मंच यांच्या सीमा कुलकर्णी यांनीही आपले विचार मांडले.

        अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी म्हणाले की, मागील वर्षी भारतरत्न डॉ. प्रा. एम.एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त कृषि विभागाने त्यांच्या जन्मदिवसाला ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून घोषित केले. शाश्वत शेती,पोषण सुरक्षा आणि महिला व पुरूष यांच्या शेतीतील कामातील समानता बळकट करण्यासाठी शासनाने एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन सामंजस्य करार केला आहे,” या कराराच्या माध्यमातून शासन काम करत आहे असे ते म्हणाले.  “महिला शेतकऱ्यांची भूमिका बळकट करण्याच्या प्रयत्नांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत सकारात्मक आणि पाठिंबा देणारे आहेत,” असे डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले. हवामान बदलामुळे शेतीपुढील अडचणी , संरचनात्मक अडथळ्यांचा सामना याबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.

         बीड येथील द्वारकाताई वाघमारे,धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील वैशाली घुगे, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शांताबाई वारवे या महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या महिला शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. दैनंदिन शेतीमधील अडचणी शासनाने करावयाच्या उपाययोजना याबाबत मते मांडली.  विदी लीगल सेंटर आणि एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतकरी  यांची स्थानिक पातळीवरील आव्हाने आणि संभाव्य धोरणात्मक व कार्यक्रमात्मक उपाययोजनांवर चर्चा झाली. महिला शेतकऱ्यांचा सर्वसमावेशक डेटाबेस तयार करण्याबाबतही चर्चा झाली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!