जागतिक दिव्यांग दिन दरवर्षी 3 डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सन 1992 पासून जागतिक दिव्यांग दिन जाहीर करण्यात आला, तेव्हापासून 3 डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तींबाबत सर्वसामान्य जनतेत (समाजामध्ये) जनजागृती निर्माण व्हावी जेणेकरुन दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत होईल. समाजातील प्रत्येक घटकांनी दिव्यांगांप्रती सहानुभूती न दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे. जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तीच्या समस्या समजावून घेता याव्यात, याबाबत समाजात जनजागृती व्हावी, दिव्यांगचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी मदत मिळावी, अशी या दिवसाची योजना आहे.
जागतिक दिव्यांग दिन –
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे १९८३ ते १९९२ हे दशक अपंगांसाठी अर्पण करण्यात आले होते. जगभरातील संपूर्ण देशभरात या दशकामध्ये अपंगांच्या उद्धारासाठी योजना राबविण्यास भाग पाडले होते. या दशकाच्या शेवटी ३ डिसेंबर जागतिक अपंग दिन साजरा करण्याबाबत या दिवसाची निवड करण्यात आली होती. १९९२ च्या ३ डिसेंबर पासून जागतिक अपंग दिन साजरा करण्यात येतो. RPWD ACT २०१६ दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार अपंग या शब्दा ऐवजी आता दिव्यांग असा शब्द बदल करण्यात आला आहे. तेव्हापासून ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन म्हणून देखील ओळखला जातो.
३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने सर्व सामान्य व्यक्ती प्रमाणे दिव्यांग व्यक्ती देखील सहजतेने कार्य करु शकतात. दिव्यांगत्वावर मात करुन यशस्वी होता येते. यासाठी गरज असते प्रोत्साहनाची त्यानिमिताने समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा, प्रभात फेरी, व्याख्याने, भाषण अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन दिव्यांग व्यक्तींचा सन्मान केला जातो.
जागतिक दिव्यांग दिन दरवर्षी ३ डिसेंबर रोजी का साजरा करण्यात येतो? या मागील पार्श्वभूमी जाणून घेऊया.. दिनांक २० सप्टेंबर १९५९ रोजी बेल्जियम देशातील एका मोठ्या कोळशाच्या खाणीत भीषण स्फोट झाला होता. या खाणीमध्ये लाखो मजूर काम करीत होते. या घडलेल्या दुर्घटनेमुळे हजारो मजूर कोळशाच्या खाली गाडले गेले, तर हजारो लोक मृत्यूमुखी पडले. मरण पावलेल्यांपेक्षा किती तरी जास्त पटीने लोक जखमी झाले. कित्येक मजुरांचे हात-पाय तुटले तर कोणाचे कायमचे कान बधीर झाले. कोळशाच्या धुरामुळे लोक कायमचे अंध झाले होते.
बेल्जियम येथे घडलेल्या घटनेमुळे खाणीत मरण पावलेल्या कुटुंबांना तेथील नियमानुसार नुकसान भरपाई मिळाली, मात्र जे लोक जखमी झाले व ज्यांना कायमचे अपंगत्व आले होते त्यांना कसल्याही प्रकारची मदत कोळसा खाण मालकाने दिली नाही. बेल्जियम सरकारने देखील याबाबत कसलीही मदत दिली नाही. कायमस्वरुपी विविध अपंगत्व आल्याने भरपाई तर मिळाली नाही, त्याचबरोबर त्यांचा रोजगार देखील बुडाला. त्यामुळे या मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला. या खाणीत काम करणारे मजूर मरण पावले तरच नुकसान भरपाई मिळत असे, मात्र कोळसा खाणीत काम करताना कोणी मजूर जखमी झाला किंवा अपंग झाला तर त्याला नुकसान भरपाई मिळत नसे सर्वच खाणीत काम करणारे मजूर एकत्रित झाले आणि त्यांनी खाण मालकाच्या विरोधात देशामध्ये प्रचंड मोठे आंदोलन उभारले.
या आंदोलनात अपंगत्व आलेल्या कामगारांना नुकसान भरपाई मिळावी व अपघात विमा लागू करावा, अशी मागणी समोर आली. अशा प्रकारचे अपंगांच्या मागणीसाठी उभारले गेलेले हे जगभरातील पहिले आंदोलन ठरले त्यामुळे जगभरातील संपूर्ण देशाचे लक्ष या आंदोलनाकडे गेले. शेवटी कोळसा खाण मालक व बेल्जियम सरकारला या अपंग लोकांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली व त्यांना योग्य तो मोबदला द्यावा लागला.
या कोळसा खाणीत झालेल्या दुर्घटनेमुळे हजारो लोकांना अंधत्व, कर्णबधीर, अस्थिव्यंग या सारखे अपंगत्व आले होते. या दिवसाची आठवण म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सन १९६२ पासून मार्च महिन्यातील तिसरा रविवार हा जागतिक अपंग दिन साजरा करण्याचे ठरविले गेले. सुरुवातीचे काही वर्ष हा दिवस स्मृतिदिन व अपघात दिन म्हणूनच साजरा करण्यात येत होता. या कालावधीत अपंग व्यक्तीच्या स्वतःच्या हक्कासाठी अनेक संघटना निर्माण झाल्या. त्यांच्या माध्यमातून आंदोलने होऊ लागली.
बेल्जियम देशातील एका घटनेने जगातले सर्व अपंग एकत्र झाले. सर्वच देशांमध्ये अपंगांसाठी विविध योजना असाव्यात, कायदे असावेत म्हणून अपंगांनी आपल्या मागण्या शासनाकडे लावून धरल्या या सर्व प्रकारामुळे संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) सन १९८१ हे वर्ष जागतिक अपंग वर्ष म्हणून साजरे करण्याचे जाहीर केले. पुढे 1992 मध्ये राष्ट्रीय अपंग पुनर्वसन परिषद कायदा तयार करण्यात आला. जागतिक अपंग दिन हा मार्च महिन्यातील तिसरा रविवारी हा वेगवेगळ्या तारखेला येऊ लागला. एकीकडे जगातील सर्व विशेष दिन हे एका विशिष्ट तारखेला असताना अपंग दिन वेगवेगळ्या तारखेला येवू लागला. त्यामुळे अपंग दिन देखील एका विशिष्ट तारखेला असावा असा मुद्दा समोर येऊ लागला. सन १९९४ मध्ये जागतिक आरोग्य परिषद व संयुक्त राष्ट्र संघाच्या पुढाकाराने ३ डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले. ३ डिसेंबर जागतिक अपंग दिन सन १९९4 पासून साजरा करण्यास सुरुवात झाली.
या दिनानिमिताने दिव्यांग व्यक्तीच्या उद्धारासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेऊन अपंगांच्या प्रती दया न दाखवता दिव्यांग व्यक्ती देखील सामान्य व्यक्ती प्रमाणे आपले जीवन सन्मानाने जगू शकतो हा आत्मविश्वास देवून त्यांना संधी देणे आवश्यक आहे. शासन स्तरावर विविध उपक्रम, योजना राबविण्यात येते. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे २०१६ मध्ये पारित झालेला दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम RPWD ACT 2016 हा कायदा भारत सरकारने पारित केला आहे. दिव्यांग व्यक्तींच्या शिक्षणापासून ते त्यांच्या पुनर्वसन होण्यापर्यंत शासनामार्फत विविध सवलती दिल्या जातात. दिव्यांग व्यक्तीच्या उद्धारासाठी ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अपंगत्वावर मात करुन यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या प्रेरणादायी यशोगाथा, व्याख्याने, विविध स्पर्धा घेवून त्यांना प्रेरित केले जाते. त्यामध्ये हेलन केलर, लुईस ब्रेल, स्टीफन हॉकिंग या महान व्यक्तींनी दाखवून दिले आहे की, दिव्यांग असून देखील अपंगत्वावर मात करुन यशस्वी होता येते. लुईस ब्रेल यांना वयाच्या तिसऱ्या वर्षी झालेल्या अपघातामुळे दृष्टी गमवावी लागली. अशा परिस्थितीत खचून न जाता आपल्या सारख्या कित्येक अंध व्यक्तींना ज्ञानाचा प्रकाश खुला करण्यासाठी ब्रेल लिपीचा शोध लुईस ब्रेल यांनी लावला. ब्रेल लिपीमुळे अंधत्व येऊन देखील आज कित्येक अंध व्यक्ती सामान्य जीवन जगत आहेत. त्यांना मेंदू ज्वरामुळे लहानपणीच मुकबधीरत्व आणि अंधत्वाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत आपले उच्च शिक्षण सामान्य शिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली अडचणींना तोंड देत पूर्ण केले. पुढे अमेरिकन विद्यापीठातील प्राध्यापिका, लेखिका आणि समाजसेविका म्हणून विश्व व्याख्यात झाल्या, अशा महान स्त्री म्हणजे हेलन केलर त्यांनी बहुअपंगत्व असून देखील यश शिखर गाठले. आज त्यांच्या प्रेरणेने असंख्य दिव्यांग व्यक्ती तसेच सामान्य व्यक्त्ती देखील प्रेरित होऊन यशस्वी होत आहेत.
स्टीफन हॉकिंग या महान शास्त्रज्ञाला स्नायूंचा असाध्य आजार झाला की, ज्यामुळे त्यांना कुठलीही हालचाल करणे जवळजवळ अशक्य झाले. तरीही त्यांनी तीक्ष्ण बुध्दिमतेच्या जोरावर भौतिकशास्त्रातील सृष्टीची निर्मिती आणि कृष्णविवर यावरील संशोधनाने नावलौकिक मिळविला.
अरुणीमा सिन्हा या महिलेने जगातील सर्वोच्च शिखर म्हणजे माउंट एवरेस्ट सर केले. आपल्याला माहिती असेल उत्तर प्रदेश (लखनऊ) येथील अरुणीमा सिन्हा यांना रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमवावे लागले होते. रात्रभर त्या रेल्वे पट्टीवर पडून होत्या. त्यांचे स्वप्न होते एव्हरेस्ट सर करण्याचे, त्यांनी पायाचे बूट कॅलिपर लावून या कठीण परिस्थितीत देखील एव्हरेस्ट शिखर पार केले. दिव्यांगत्व आले म्हणजे तो व्यक्ती काही करु शकत नाही, असा समज त्यांनी दूर केला.
डॉ. योगेश साळे
प्राचार्य
आरोग्य व कुटूंब कल्याण,
प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर