आरवली:(सचिन पाटोळे)
टेरव (दत्तवाडी) येथील कु. सिद्धी अनंत कदम हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेत ९२.४०% गुण मिळवून आपल्या शाळेचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. ती जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचलित सुमन विद्यालय, टेरव येथील विद्यार्थिनी आहे.
सिद्धीचे आई-वडील शेतकरी असून घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. वाडीमध्ये एक छोटीशी खाऊची टपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. अभ्यासाबरोबरच सिद्धी आपल्या पालकांना टपरीवर बसून, घरकामात मदत करत असते. तीने कोणतीही खाजगी शिकवणी न लावता, केवळ शाळेतील मार्गदर्शनावर विश्वास ठेवून हे यश संपादन केले आहे.
दररोज दत्तवाडीहून एस.टी. बसने टेरवमध्ये ये-जा करून नियमितपणे शाळेला उपस्थित राहणाऱ्या सिद्धीने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर हा स्तुत्य टप्पा गाठला आहे.
सिद्धीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण गावातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुमन विद्यालयातील शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थ यांचाही तिच्या या यशात मोलाचा वाटा असून तिचा हा प्रेरणादायक प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.