यशोदा पूलाचे सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते लोकार्पण

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी 
दि .६ : यशोदा पुलाच्या ठिकाणच्या कमान (बॉक्ससेल) मुळे मळेभागातील नागरिकांना होणारा महापूराचा त्रास कमी होण्यास मदत झाली आहे. महापूराचा त्रास कायमचा दूर व्हावा यासाठी याच परिसरात आणखीन तीन ठिकाणी कमान पूल उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे मळेभागातील नागरिकांना दरवर्षी सतावणारा महापूराचा प्रश्‍न दूर होणार आहे, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.
येथील पंचगंगा नदी परिसरातील जुना यशोदा पुलाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कमान पूलाचे काम पूर्ण झाले आहे. सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते आणि आमदार प्रकाश आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुलआवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पूलाचे लोकार्पण करत गुरुवारी सकाळपासून हा रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला.                             विशेष म्हणजे याच रस्त्यावरुन बुधवारी सायंकाळी राणाप्रताप गणेशोत्सव मंडळाची भव्य अशी मूर्ती आणण्यात आली. त्यामुळे श्रींच्या आगमनाने हा रस्ता खुला झाला आहे.
नदीवेस नाका ते पंचगंगा नदी या रस्त्यावर तीन ते चार कमानी असलेला पूल होता, जो यशोदा पूल म्हणून ओळखला जात होता. मोठ्या पूलाच्या बांधकामावेळी रस्ता रुंदीकरणात हा पूला पाडण्यात आला. त्याठिकाणी मोठे नळ टाकून पाणी जाण्यासाठी सुविधा करण्यात आली होती. परंतु दरवर्षी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या नळांतून म्हणाव्या त्या प्रमाणात पाण्याचा निचरा होत नसल्याने पुराचे पाणी मळेभागात पसरत होते. त्यामुळे यशोदा पुलाच्या ठिकाणी पूर्ववत कमान असलेलाच पूल बांधण्यात यावा अशी मागणी सातत्याने शेतकरी व नागरिकांतून केली जात होती. या संदर्भात संजय कुलकर्णी, अजय जाधव, उल्हास लेले, महावीर कोल्हापूरे आदींनी आमदार आवाडे यांच्याकडे मागणी केली होती.  पूराचा होणारा त्रास व पूलाची गरज ओळखून आमदार आवाडे यांनी त्या संदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करुन यशोदा पूल येथे बॉक्ससेल बांधण्यासाठी निधी मंजूर करुन आणला होता. या पूलामुळे यंदाच्या महापूराचा फटका बर्‍याच प्रमाणात कमी होण्यास चांगलीच मदत झाली. त्यामुळे आमदार आवाडे यांनी याच परिसरात आणखीन तीन कमान पूल बांधण्याचे जाहीर केले असून त्या संदर्भातील कामकाजही सुरु झाले आहे.
गुरुवारी या यशोदा पूलावरुन वाहतूक सुरु करुन त्याचे लोकार्पण करण्यात आले. यानिमित्ताने ज्या घरात पूराचे पाणी पहिल्यांदा शिरते अशा कटके कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा घालण्यात आली. तसेच यानिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बाळासाहेब कलागते, उत्तम आवाडे, अहमद मुजावर, संजय कुलकर्णी, उल्हास लेले, महावीर कोल्हापूरे, मलकारी लवटे, सौ. किशोरी आवाडे, सौ. उर्मिला गायकवाड, सौ. शहनाज मुजावर, नजमा शेख, पापालाल मुजावर, रमेश कबाडे, बाबासाहेब पाटील, राजेंद्र बचाटे, किशोर पाटील, संपत जामदार,  शांतिनाथ मगदूम, एम. के. कांबळे, शेखर शहा, नंदू पाटील, प्रशांत कांबळे, प्रितम गुगळे, राहुल घाट, नरसिंह पारीक, सागर कम्मे, शैलेश गोरे, राजू दरीबे, जयपाल हेरलगे, रमेश पाटील, बजरंग कुंभार, कटके बंधू, तानाजी कोकितकर, शिवाजी काळे, सुभाष जाधव, चंद्रकांत माळी, शशिकांत नेजे, शिवाजी माळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.