फणसकिंग हरिश्चंद्र देसाई यांचा स्वराज्य ध्वज सोहळा प्रसंगी सत्कार

आ.रोहित पवार यांच्याकडून जामखेड येथे सत्कार व सन्मान

 

 

लांजा:नसिर मुजावर

दि.१५: महाराष्ट्रातील फणसकिंग म्हणून ओळख असणारे हरिश्चंद्र देसाई यांनी फणस लागवड करुन मिळविलेल्या नावलौकीकाची दखल घेत त्यांचा अहमदनगर जिल्ह्यातील शिवपट्टण किल्ला खर्डा, तालुका जामखेड येथे दसऱ्याच्या निमित्त स्वराज्य ध्वज प्रतिष्ठापना सोहळा कार्यक्रमात जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याकडून सत्कार व सन्मान करण्यात आला.

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून स्वराज्य ध्वज भारतातील सर्वात उंच भगवा ध्वजाचे अनावरण दसऱ्याच्या निमित्त खर्डा मध्ये करण्यात आले. ध्वजाची उंची ७४ मिटर इतकं आहे आणि स्तंभाच वजन १८ टन इतकं आहे. रोहित पवारांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी असलेल्या व्यक्तींच्या हस्ते पूर्ण कार्यक्रम पार पाडण्यात आला. महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, ६ राज्य व ९६ ठिकाणी हा ध्वज नेण्यात आला आणि एकूण १२००० किलोमीटर असा प्रवास ह्या ध्वजाने केला आहे. ९६ भागातील मातीचं पूजन व कर्जत जामखेड मधील २०० गावातील मातीचे पूजन सर्वांच्या हस्ते करण्यात आले व नंतर स्वराज्य ध्वजाचे पूजन करण्यात आले.

हरिश्चंद्र देसाई यांची संपूर्ण महाराष्ट्रात फणसकिंग म्हणून ओळख आहे. देसाई यांच्या फणस लागवडीच्या कार्याची दखल अनेक वेळा घेऊन त्यांचा सन्मान यापूर्वी देखील झाला आहे. अशातच कोकणातील या शेतकरीचा स्वराज्य ध्वज सोहळा कर्जत जामखेड येथे यथोच्चीत सन्मान करण्यात आला. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली ही स्वराज्य ध्वज यात्रा गेल्या महिन्यात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून घेण्यात आली होती.