रत्नागिरी : प्रतिनिधी
दि.17:- जिल्हा उद्योग केंद्र आणि बँका यांनी विविध शासकीय कर्ज योजनांचा लाभ लाभार्थींना देण्यासाठी मासिक 200 प्रकरणांचे उद्दिष्ट ठेवून त्याबाबतचे नियोजन करुन अधिकाधिक जणांना स्वयंरोजगार मिळवून द्यावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी केले आहे.
जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, उद्योजक प्रशांत पटवर्धन आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा अग्रणी बँकेचे एन.डी.पाटील यांनी आतापर्यंत वितरित कर्ज प्रकरणांची माहिती दिली. स्वयंरोजगारासोबत इतरही कर्ज योजना आहेत. याबाबत उद्योग केंद्राने माहिती गरजूपर्यंत पोहोचवावी यासाठी बँकांच्या सहायाने शिबीरांचे आयोजन करावे तसेच येथील उद्योगात आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी उद्योजकांनी याला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ.पाटील यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास कार्यक्रमाला गती देण्यात येणार असून त्याबाबतचा आराखडा तयार करुन आवश्यक ते प्रशिक्षण जिल्हा उद्योग केंद्राने आयोजित करावे अशी सूचना डॉ. पाटील यांनी केली.