सांगली:प्रतिनिधि
दि:२९: सहा एकराचा टोमॅटोचा फड दिला सोडून
सांगलीतील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून संपूर्ण पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतातच टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे
*खर्च चार लाख उत्पन्न दोन रुपयेही नाही*
भारतात शेती हा बेभरवशाचा व्यवसाय मानला जातो. अनेक संकटांवर मात करून शेतकऱ्यानं एखादं पीक चांगलं आणलंच तर त्याला बाजारात भाव मिळत नाही. कवडीमोल दरानं माल विकल्यानं कधीकधी घातलेले पैसेही निघत नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो आणि कर्जाच्या बोजाखाली दबतो. सध्या सांगली जिल्ह्यातील काही भागात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात शेती आहे. मात्र, टोमॅटोला दर नसल्यानं तोडणीही परवडत नाही. त्यामुळे मिरज तालुक्यातील बेडग येथे शेतात टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे.
मिरज तालुक्यातील बेडगचे शेतकरी सारंग माळी हे आधुनिक शेती करतात. त्यांनी आपल्या सहा एकर क्षेत्रात टोमॅटो लागवड केली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही आला. विविध संकटांवर मात करत टोमॅटोचा फड चांगला आला. मात्र, या काळात नेमका द घसरला. टोमॅटोला भाव अगदीच कमी असल्यनं शेतकऱ्याने टोमॅटोचा सहा एकराचा प्लॉट तोडणी न करताच सोडला आहे. त्यामुळे शेतातच टोमॅटोचा लाल चिखल झाल्याचे चित्र आहे.
* खर्च चार लाख उत्पन्न दोन रुपयेही नाही*
बेडग येथील सारंग माळी या शेतकऱ्याने सहा एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली. लागवड केली त्यावेळी टोमॅटोस चांगला दर होता. पण त्यांनी ज्यावेळी पहिला तोडा घेतला तेव्हा त्यांना फक्त चार रुपये किलोला दर मिळाला. दोन टन टोमॅटो पहिल्या तोड्यात उत्पादन काढण्यात आले. त्याचे चार रुपयांनी फक्त आठ हजार रुपये झाले. मजुरी सहा हजार गेली. वाहतूक, हमाली वैगरे खर्च वगळता दोन रुपये ही रक्कम शिल्लक न राहिले नाहीत. सहा एकर टोमॅटो लागवड करण्यासाठी एकूण चार लाख चाळीस हजार खर्च झाला. त्यातच पहिल्या तोड्यात दोन रुपयेही न राहिल्याने अधिकचे नुकसान होण्यापेक्षा तोडे बंद केले असल्याचे सारंग माळी यांनी सांगितले.
केंद्र सरकारचे चुकीच्या निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यात राज्य सरकारकडून ही शेतकऱयांना सहकार्य मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. इतर देशात भाजी शेती मालास चांगला दर मिळतो आहे. परंतु भारतातच शेतकऱ्याने लागवडीसाठी केलेला खर्च ही निघत नाही. शेती आणि शेतकरी दोन्ही अडचणीत येत आहेत, असे मत शेतकरी सारंग माळी यांनी व्यक्त केले.