आडावा येईल त्याचा कार्यक्रम होणारच

आमदार प्रकाश आवाडेचा विरोधकांना इशारा

इचलकरंजी -विजय मकोटे
संपूर्ण कोरोना काळात इचलकरंजी नगरपरिषदेकडून जनता जनार्दनासाठी एक पैशाचाही निधी खर्च केला गेला नाही, हे दुर्दैवी आहे. चांगला कारभार आणि शहराचा विकास या उद्देशाने सत्तेत गेलो असलो तरी तेथील काही मंडळींनी आडावा पाय मारता आम्हांला काम करु दिले नाही. म्हणूनच आता काही तत्वांना छेद देत पुढे जायचे असून आडावा येईल त्याचा कार्यक्रम होणारच, असा इशारा आमदार प्रकाश आवाडे यांनी दिला.
येथील ताराराणी पक्ष कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार प्रकाश आवाडे मार्गदर्शन करताना म्हणाले, इचलकरंजी नगरपरिषद ही जनतेची शिखर संस्था असून कोरोना काळात त्याच जनतेच्या  औषधोपचारासाठी एक पैसा खर्च करु शकली नाही. पत्रव्यवहार करुन सहकार्याची तयारी दर्शविली तरी निधीच शिल्लक नसल्याचे कळविले. अशी सत्ता नको म्हणूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सत्तेतील काही मंडळीवर असलेल्या नाराजीमुळे त्यांना दूर करुन आम्हाला सत्तेत सहभागी करुन घेतले. पण आम्हांला अपेक्षित असे काम करु दिले जात नाही. कचरा डेपो असो, कट्टीमोळा पाणी योजना असो सतत आडवा पाय मारत, मक्तेदाराला दम भरत काम करु दिले जात नाही. 100 शुध्द पेयजल प्रकल्पांसाठी निधी आणून दिला. पण आवाडेंना श्रेय मिळणार म्हणून ते रखडवले आहे.
नगरपरिषदेत केवळ आरोप-प्रत्यारोप सुरु असून तेथील कारभार जगजाहीर आहे. हे चित्र बदलण्यासाठी ताराराणी पक्ष कोणतीही युती, आघाडी न करता सर्वच जागा स्वबळावर लढविणार आहे. आणि विधानसभेतील झंझावाताप्रमाणे नगरपरिषद निवडणूकीत ताराराणी चे वादळ निर्माण होऊन सर्वाधिक जागा मिळतील असा विश्‍वास आहे. ज्याला निवडणूक लढवायची इच्छा आहे त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. उमेदवारी ही ओळख बघून नव्हे तर काम बघून दिली जाणार आहे. भागातील काम कसे आहे, किती लोक मानतात, नेतृत्व क्षमता आहे की नाही याची पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी आतापासून जोमाने कामाला लागावे, असे आवाहन आमदार आवाडे यांनी केले.
वस्त्रोद्योगात मंदी आहे ही नकारात्मकता सोडून सकारात्मकता स्विकारा. रडायचं बंद करुन लढायची तयार करा. काही अडचणी आहेत तर काहींना चांगले दिवस आहेत, जे आहे ते मान्य करा. जो राबायची, कष्टाची आणि नवनिर्मितीची तयारी ठेवेल त्याला आगामी तीन-चार वर्षे ही अत्यंत चांगली असणार आहेत, अशी संधी पुन्हा येणार नाही. कष्ट, राबवणूक, स्पेशालिटी व नवनिर्मितीला महत्व द्या त्यातून यश निश्‍चित मिळेल.
आतापर्यंत आम्ही कधीच आमची ताकद राजकारणात नकारात्मक वागत कोणालाही हिसका दाखविण्यासाठी वापरलेली नाही. परंतु काळानुरुप काही तत्वांना छेद देत मार्गक्रमण करायचा निर्णय घेतला आहे. कार्यक्रम करायचाच हे ठरवून पुढे जात आहे. विनाकारण जो आडवा येईल त्याचा कार्यक्रम निश्‍चितपणे होईल. म्हणून इचलकरंजी आणि सर्वसामान्यांचा विकास हेच ध्येय ठेवून वाटचाल करायची असून इचलकरंजीचे भविष्य जगाच्या पाठीवर गाजविल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असे आमदार आवाडे यांनी शेवटी सांगितले.