मुंबई :प्रतिनिधी
दि.२: आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ या देशातील पहिल्या एआय-आधारित कौशल्य सर्वेक्षण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. वांद्रे, खार आणि सांताक्रुझ (एच पश्चिम वॉर्ड) परिसरातील सुमारे ५५ हजार घरांमध्ये १८ ते ४० वयोगटातील युवक-युवतींच्या कौशल्य व आवडीचा अभ्यास केला जाणार आहे.
नॅशनल कॉलेज, वांद्रे येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना शेलार यांनी ‘विकसित भारत २०४७’ आणि ‘विकसित महाराष्ट्र’च्या दिशेने कौशल्य विकास महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. सर्वेक्षणानंतर २०२७ पर्यंत १५ हजार युवकांना प्रशिक्षण देऊन त्यापैकी ५ हजारांना रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
सौरभ कटियार यांनी सांगितले की, सर्वेक्षण, प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शन अशा तीन टप्प्यांत योजना राबविण्यात येणार असून उद्योग, प्रशिक्षण संस्था व महाविद्यालयांच्या समन्वयातून युवकांना संधी दिली जाईल.ही योजना जिल्हा नियोजन समितीच्या अनुदानातून राबविण्यात येणार असून ‘सक्षम युवक, सक्षम राज्य’ या ब्रीदाखाली राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.