अमरावती:प्रतिनिधि
दि:२८:जुलै: महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. मात्र, करमचंद गांधी हे गांधीजींचे खरे वडील नसून त्यांचे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी अमरावतीतील कार्यक्रमात केले आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे यापूर्वीही ते अनेकवेळा चर्चेत आले आहेत. बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते
भिडे म्हणाले, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही यावेळी संभाजी भिडे यांनी केला.
तसेच हिंदुस्थान हा जगाच्या पाठीवरील एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे. हिंदूंचे शौर्य अफाट आहे. परंतु हिंदू स्वतःचा धर्म, कर्तव्य, जबाबदाऱ्या विसरला. हिंदुस्थानची फाळणी होऊन देश षंढ पुढाऱ्यांच्या हाती गेला आणि हिंदूंची व हिंदुस्थानची अधोगती झाली, असे ते म्हणाले.
दरम्यान, भिडे यांच्या या विधानावरुन काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आक्रमक झाले असून त्यांनी विधानसभेत यावरुन सरकारला धारेवर धरले. तसेच भिंडेंनी महात्मा गांधींबद्दल केलेले विधान अत्यंत निंदनीय आणि वादग्रस्त असून, सरकारने तातडीने संभाजी भिडेंवर कारवाई करावी, तसेच त्यांना IPC 153 अंतर्गत अटक करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. संभाजी भिडे यांचे हे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणार आहे. अशा व्यक्तीला सरकारने ताबडतोब अटक करावी, असे ते म्हणाले