असाही एक . . . आगळा वेगळा शाही विवाह सोहळा

कोल्हापूर: प्रतिनिधी

दि.१: तब्बल १०५ वर्षाची शतकोत्तर परंपरा असलेल्या दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात राम गणेश गडकरी सभागृहात आज अनेक मान्यवर जमले होते. त्याला कारण ही तसेच होते …. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी एक आगळ्या -वेगळ्या आंतरजातीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विवाह म्हटलं की प्रथम प्राधान्य असते ते वर अथवा वधू स्वजातीय,आपल्या धर्माचे आहेत का हे पाहणे.तथापि या परंपरेला छेद देत हा विवाह सोहळा साजरा होत होता .

          गुरव जातीतील रामचंद्र गुरव तर कायस्थ प्रभू जातीतील वधू गौरी चिटणीस या दोघांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.यात विशेष ते काय ? विशेष तर आहेच.यातील वर 90% तर वधू 100% कर्णबधीर. मात्र त्यांनी आपल्यातील या उणीवांवर मात करत कुटुंबीयांच्या संमतीने आयुष्यभरासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

           त्यांच्या या निश्चयाला विनयकुमार मदनमोहन लोहिया कर्णबधीर विद्यालय व दिव्यांग कल्याण सक्षमीकरण कार्यालय (कोल्हापूर) यांनी पाठिंबा दिला. या विधायक निर्णयाला पाठिंबा व वधू – वरांना आशीर्वाद देण्यासाठी दस्तूरखुद्द जिल्हयाचे नूतन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जस्मिन,निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आदी मान्यवर उपस्थित राहिले.

          जिल्हा प्रशासनातील इतके मोठे पाहुणे पाहून वधु-वरासह उपस्थितांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले ! तर आयोजकांना कृत कृत झाल्यासारखे वाटले.सांकेतिक भाषा …. खाणा …खुणा , हावभाव या सर्वांच्या पलीकडे जाऊन हा शाही विवाह सोहळा केवळ समाजाप्रती असलेल्या कारूण्य भावनेने पार पडला. या मंगल प्रसंगी संस्थाध्यक्ष निर्मलकुमार लोहिया,विनोदकुमार लोहिया,प्रशांत लोहिया, उपाध्यक्ष नितीन वाडीकर,श्रीमती अनेरी लोहिया नेमचंद संघवी,सचिव प्रभाकर हेरवाडे, प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर जाधव,साधना कांबळे,एस एस चव्हाण यांच्यासह तब्बल एक हजाराहून अधिक स्नेही – गुणीजणांच्या उपस्थित पार पडला .