घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या श्री मूर्तींचे विसर्जन पूर्वीप्रमाणे पंचगंगा नदीतच करण्यास परवानगी द्यावी

ताराराणी पक्षाच्यावतीनेआयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांना निवेदन

इचलकरंजी : संजय आंबे
दि. ७ ऑगस्ट :दोन वर्षे कोरोना महामारीच्या संकटात सापडलेले सण-उत्सव राज्य शासनाने बंधनमुक्त केले आहेत. त्याच अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या श्री मूर्तींचे विसर्जन पूर्वीप्रमाणे पंचगंगा नदीतच करण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवदेन ताराराणी पक्षाच्यावतीने विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांना दिले.
निवेदनात, सन 2019 ते 2021 या कालावधीत संपूर्ण देशभरात कोरोना महामारीने थैमान घातले होते. परिणामी गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनाने सण-उत्सवांवर बंधने घातली. त्यातच प्रदुषणाचा प्रश्‍न पुढे करत शहरातील घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्री मूर्तींचे विर्सजन पंचगंगा नदीऐवजी शहापूर खणीमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून श्री मूर्तींचे विसर्जन हे शहापूरच्या खणीत केले जात आहे. कोरोना काळात घरगुती श्री मूर्ती विसर्जनासाठी प्रशासनाच्या वतीने जल आणि निर्माल्य कुंडांची व्यवस्था करुन देण्यात आली होती. कोरोनाचे संकट आणि शासनाचे निर्बंध यामुळे नागरिकांनी त्या आवाहनाला प्रतिसाद देत घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या श्री मूर्तीचे विसर्जन शहापूर खणीमध्ये करुन सहकार्य केले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने सर्व सण, उत्सव खुलेपणाने साजरे करण्यास परवानगी दिली आहे. याद्वारे दोन वर्षे दबलेल्या उत्साहाला शासनाने मोकळीक दिली आहे. प्रदुषणाचा मुद्दा उपस्थित होण्यापूर्वी इचलकरंजी शहर व परिसरातील घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या श्री मूर्तींचे विसर्जन हे पंचगंगा नदीमध्येच केले जात होते. तर कॉ. के. एल. मलाबादे चौक ते नदीवेस नाका या मुख्य मार्गावर स्वागत कक्ष उभारुन विसर्जन मिरवणूकीत सहभागी मंडळांचे स्वागत करुन सामाजिक सलोखा राखण्याचे काम केले जात होते. परंतु तीन वर्षापासून श्रींचे विसर्जन हे पंचगंगा नदीऐवजी शहापूर खणीत करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. मात्र आता राज्य शासनाने सण-उत्सव बंधनमुक्त केल्याने सर्वांच्या जनभावना आणि उत्सव यांचा विचार करुन प्रशासाने यंदा घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या श्री मूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीमध्ये करण्यास परवानगी द्यावी. तसेच या संदर्भात तातडीने निर्णय घेऊन त्याची माहिती  सर्वांना द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाचा स्विकार उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केला.
या शिष्टमंडळात अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, शंकर येसाटे, एम. के. कांबळे, नरसिंह पारीक, अविनाश कांबळे, महावीर कुरुंदवाडे, शैलेश गोरे, रमेश पाटील, अनिल शिकलगार, विजय पाटील, बजरंग कुंभार, राजू दरीबे, राजू माळी, विजय पोवळे आदींचा समावेश होता.