इचलकरंजी:विजय मकोटे
दि .५ :पंचगंगा नदी परिसरातील जुना यशोदा पुलाच्या ठिकाणी आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ५ कोटी ७४ लाख रुपये निधीतून बॉक्ससेल (कमान) पूल बांधण्यात येणार आहे. या कामाची पायाभरणी तसेच रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ रविवारी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कामामुळे गावभाग मळेभागातील नागरिकांना सतावणारा पुराचा प्रश्न दूर होण्यास मदत होणार आहे.
नदीवेस नाका ते पंचगंगा नदी रस्त्यावर कमान असलेला पूल होता. तो यशोदा पूल म्हणून ओळखला जात होता. काही वर्षांपूर्वी हा पूल रस्ता रुंदीकरणासाठी पाडण्यात आला. त्याठिकाणी मोठे नळ टाकून पाणी जाण्यासाठी सुविधा करण्यात आली. परंतु पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या नळातून योग्य त्या प्रमाणात पाणी जात नसल्याने पुराचे पाणी मळेभागात पसरून घरात शिरते. त्यामुळे यशोदा पुलाच्या ठिकाणी पूर्ववत कमान पूल बांधण्यात यावा अशी मागणी सातत्याने शेतकरी व नागरिकांतून केली जात होती. या संदर्भात आमदार आवाडे यांच्याकडेही मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आमदार आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरु केला. सन 2019 व 2021 साली महापुरामुळे निर्माण झालेली परिस्थितीची माहिती देत पुलाची गरज पटवून दिली.
राज्य शासनाने जुलै 2022 च्या अर्थसंकल्पात यशोदा पूल येथे बॉक्ससेल बांधण्यासाठी 5.74 कोटींचा तसेच नदीवेस नाका ते पंचगंगा नदी रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी 4.10 कोटींचा निधी मंजूर केला. त्यानुसार या दोन्ही कामांचा शुभारंभ आमदार आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कामामुळे शेतकरी व मळेभागातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, सर्जेराव पाटील, अहमद मुजावर, नंदू पाटील, एम. के. कांबळे, ताराराणी महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड, ताराराणी पक्ष युवा जिल्हा अध्यक्ष वैभव हिरवे, पापालाल मुजावर, महावीर कुरुंदवाडे, आबा जाधव, संजय कुलकर्णी, महावीर कोल्हापुरे, उल्हास लेले, राजेंद्र बचाटे, शैलेश गोरे, पै.अमृत भोसले, बाळासाहेब माने, जयपाल हेरलगे, अरुण आवळे, राजाराम बोगार्डे, किशोर पाटील, सुभाष जाधव, प्रशांत कांबळे, राहुल घाट, श्रीकांत टेके, किरण लंगोटे, अविनाश कांबळे, शिवाजी काळे, संजय आरेकर, आर. के. पाटील, राजू माळी, शशी नेजे, मयूर कोल्हापुरे, राजेंद्र दरीबे, अविनाश जाधव, जितेंद्र मोळके, विजय गोंधळी, राजू पुजारी, विजय देसाई, रमेश कांबळे, कुमार काटके, सुनील शेरसाने, रघुनाथ सोलगे, नजमा शेख, सपना भिसे, अलका शेलार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.