दानोळी:प्रतिनिधी
दि .७ :अनेकांनी आपल्या स्वप्नांना मर्यादा घालून घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना करिअरच्या उपलब्ध वाटा माहित नसतात. विद्यार्थ्यांकडे कोणते कौशल्य आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने करिअर, विभाग निवडावे. अन्यथा भविष्यात दिशा भरकटले जातात. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी असे करिअर मार्गदर्शन परिसंवात दिशादर्शक ठरतात. असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके यांनी केले.
त्या दक्षिण भारत जैन सभा कोल्हापूर विभाग व यड्राव येथील शरद सायन्स अॅण्ड कॉमर्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर येथे १० वी, १२ वी उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांकरीता करिअर मार्गदर्शन परिसंवादात बोलत होते. प्रथमाचार्य परमपूज्य १०८ श्री शांतिसागरजी महाराज आचार्यत्व पदारोहण शताब्दी वर्षानिमित्त या परिसंवादाचे आयोजन केले होते. जेष्ठ करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर प्रमुख वक्ते होते.
डॉ. सोळंके पुढे म्हणाल्या, सध्या जगात माहिती ओव्हरलोड झाला आहे. त्यातून योग्य, निवडक व उपयुक्त माहिती घेवून करिअर निवडावे. यामध्ये पालकांनी सहभागी व्हावे. निवडलेल्या क्षेत्रात सातत्य ठेवावे. स्वत:साठी उत्तम करा, ते काम देशासाठी विधायक होईल.
यावेळी विवेक वेलणकर यांनी करिअरच्या क्षेत्रात जगभरामध्ये कोणत्या कोणत्या संधी, त्याचे पात्रता परिक्षा, महाविद्यालय, कोर्सचा कालावधी, बेसिक शिक्षण यांची माहिती दिली. शरद इंजिनिअरिंगचे डॉ. सागर पाटील यांनी सर्व विभागासाठी लागणारी कागदपत्रे, शिष्यवृत्ती व प्रवेश प्रक्रिया याची माहिती दिली.
दक्षिण भारत जैन सभेचे महामंत्री डॉ. अजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शरद इन्स्टिट्युटचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे, दक्षिण भारत जैन सभेचे डॉ. चंद्रकांत चौगुले, भूपाल गिरमल, राजेंद्र झेले, दादासाहेब पाटील (चिंचवाडकर), कोल्हापूर विभागाचे पदाधिकारी, कर्मवीर मल्टीस्टेटचे चेअरमन सागर चौगुले, प्राचार्य, प्राध्यापक, पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थीत होते. आभार राजेंद्र झेले यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. कल्याणी बेडेकर, प्रा. स्मिता कोरे यांनी केले.