जागतिक दर्जाचे मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहनासाठी राज्य शासन तत्पर :कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा
महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उदघाटन
मुंबई: प्रतिनिधी
दि.३: जगतिक पातळीवर विविध क्षेत्रात अत्यावश्यक मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता दर्जेदार कुशल मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन तत्पर आहे. राज्यात लागू करण्यात आलेली ‘पीएम सेतू योजना’ आणि ”मुख्यमंत्री महाफंड स्वयंरोजगार योजना’ हा त्याचाच प्रमुख भाग असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

कुर्ला येथील डॉन बॉस्को इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे (IndiaSkills 2026) उद्घाटन कौशल्य मंत्री लोढा यांच्या हस्ते झाले. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) आणि महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटी (एमएसएसडीसी) यांच्या विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांसाठी कौशल्य विकासाचा भव्य आणि प्रेरणादायी दृष्टिकोन मांडत तरुणांना नवी दिशा दिली आहे. याच संकल्पनेतून त्यांनी देशभरातील ‘आयटीआय’च्या अत्याधुनिकीकरणासाठी ६० हजार कोटींची ‘पीएम सेतू योजना’ आखली आहे. महाराष्ट्रालाही त्याचा लाभ होणार असून पहिल्या टप्प्यात २४२ कोटी खर्च करून छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूरच्या ‘आयटीआय’चे आधुनिकीकरण होणार आहे. हाच दृष्टिकोन राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान नेतृत्वाखाली प्रभावीपणे अंमलात आणला जात आहे. पुढच्या काही दिवसात स्वयंरोजगार आणि स्टार्टअप्सकरीता ‘मुख्यमंत्री महाफंड स्वयंरोजगार योजना’ आकाराला येईल. या योजनेतून राज्यभरातील स्टार्टअप्स सुरु करणाऱ्या ५ लाख तरुणांना सामायिक ऑनलाईन चाचणीद्वारे निवड करून ५ लाखांची आर्थिक मदत मिळवून दिली जाणार असून त्याच्या व्याजाचा अर्धा भार राज्य शासन उचलणार असल्याची माहिती कौशल्य मंत्री लोढा यांनी यावेळी दिली.चीनमधील शांघाय येथे या वर्षी जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहे. त्याकरिता यांत्रिकी, वीज संच मांडणी, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, औद्योगिक तंत्रज्ञान, सायबर सिक्युरिटी आणि सामाजिक सुरक्षा तंत्रज्ञान या सहा कौशल्य क्षेत्रांशी संबंधित कौशल्य स्पर्धांचे देशभरात आयोजन करण्यात येत आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने मुंबईत ३ आणि ४ फेब्रुवारी दरम्यान स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत राज्यभरातून शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून राज्यस्तरावरील विजेते उमेदवार गांधीनगर, गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागासाठी पात्र ठरतील. या स्पर्धेतून विजेत्या उमेदवारांची नावे पुढील आंतरराष्ट्रीय नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती कौशल्य मंत्री लोढा यावेळी दिली.कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, देशात तरुणांमध्ये सृजनशीलता असून कोणत्याही क्षेत्रात भारत यापुढे मागे राहणार नाही. कौशल्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून तरुणांचे भविष्य घडवण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्रात पुढच्या वर्षभरात ऑलिम्पिकच्या धर्तीवर कौशल्य स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव द्यावा. तसेच पुढच्या तीन वर्षात म्हणजेच २०२९ ची जागतिक कौशल्य स्पर्धा महाराष्ट्रात होईल यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येतील.महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेच्या उदघाटन समारंभाला महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, सोसायटीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी आनंद माळी, डॉन बॉस्को सेंटर फॉर लर्निंगचे संचालक फादर अँटोनी पिंटो आणि डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे प्राचार्य अमर प्रभू तसेच सीआयआयच्या कौशल्य विकास पॅनलचे संयोजक बॉबी कुरियाकोस उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.