‘बहुजन हिताय’साठी व्यापक आघाडीची गरज:डॉ.हुलगेश चलवादी

शरद पवार-रामदास आठवले भेटीनंतर नव्या राजकीय समीकरणांची चर्चा

पुणे: प्रतिनिधी
दि.१३:राज्यातील आणि देशातील बहुजनांच्या कल्याणासाठी ‘बहुजन हिताय’चा विचार करणाऱ्या राजकीय पक्षांची व्यापक आघाडी गरजेची आहे,असे मत बहुजन नेते, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात महायुतीसोबत आणि राष्ट्रीय स्तरावर एनडीएमध्ये सहभागी व्हावे, असे खुले आमंत्रण केंद्रीय राज्यमंत्री, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) प्रमुख मा.रामदास आठवले यांनी दिल्यानंतर डॉ.चलवादी यांनी त्यांचे मत व्यक्त केले.समान विकासाचा अजेंडा, सामाजिक न्याय आणि बहुजन कल्याण या मुद्द्यांवर एकमत होत असेल, तर व्यापक आघाडीची कल्पना सकारात्मक दृष्टीने बघिलती पाहिजे, असे डॉ.चलवादी म्हणाले.आठवले यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यातील खासगी रुग्णालयात भेट घेतली.या पार्श्वभूमीवर डॉ.चलवादी यांनी हे मत व्यक्त केले. बहुजन समाजाच्या प्रश्नांवर ठोस हमी आणि धोरणात्मक बांधिलकी मिळाल्यास अशा कोणत्याही व्यापक राजकीय संवादाला सकारात्मक पाठिंबा देणे आवश्यक आहे. संवाद आणि समन्वय हाच लोकशाहीचा मार्ग आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.महाराष्ट्राच्या हितासाठी, उद्योग, रोजगार, शेती, शिक्षण आणि सामाजिक न्याय या विषयांवर ठोस भूमिका घेणारी व स्थिरता देणारी आघाडी निर्माण झाली, तर त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल.राजकारणात वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर सद्भावना आणि संवाद कायम ठेवणे ही लोकशाहीची ताकद आहे. रामदास आठवले यांनी शरद पवार यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली, ही सकारात्मक आणि सुसंस्कृत राजकीय परंपरेची जपणूक आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.