आंतरविद्याशाखीय संशोधन हीच शाश्वत प्रगतीची गुरुकिल्ली: मदनदादा भोसले
किसन वीर महाविद्यालयात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न
दि.१७:आजच्या काळात शाश्वत ऊर्जा, हवामान बदल, आरोग्य आणि डिजिटल तंत्रज्ञान यांसारख्या मोठ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान यांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. अशी एकत्रित संशोधन पद्धतच या आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यास मदत करते.आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातूनच समाजाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाचा मार्ग सापडतो. आंतरविद्याशाखीय संशोधन हीच शाश्वत प्रगतीची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे मदनदादा भोसले यांनी केले.
किसन वीर महाविद्यालयात ‘इंटरडिसीप्लिनरी अप्रोचेस इन सायन्स, इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ या विषयावर आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते परिषदेचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. ही आंतरराष्ट्रीय परिषद किसन वीर महाविद्यालयातील सायन्स शाखा, संशोधन व विकास कक्ष आणि अंतर्गत दर्जा हमी कक्ष तसेच एरोजेल मटेरिअल रिसर्च सेंटर, यौनसाई विद्यापीठ, दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे होते. या कार्यक्रमास बीजभाषक म्हणून पुणे येथील सी-मेट चे शास्त्रज्ञ डॉ.सुधीर अरबुज, सचिव डॉ. जयवंत चौधरी, उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर, परिषदेचे समन्वयक प्रा.(डॉ.) ज्ञानदेव झांबरे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कांबळे, सहसमन्वयक व संशोधन व विकास कक्षाचे संचालक डॉ. संदीप वाटेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मदनदादा पुढे म्हणाले की, जनता शिक्षण संस्थेचे ध्येय नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन संस्कृती आणि सर्वांगीण विकास घडवणे हे राहिले आहे. विद्यार्थ्यांना केवळ नोकरीसाठी नव्हे, तर ज्ञाननिर्मितीतील नेतृत्वासाठी तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ही परिषद त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी आंतरविद्याशाखीय संशोधन कशासाठी करायला हवे हे उदाहरणातून स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी एखाद्या गोष्टीकडे बघताना संशोधक अभिवृत्तीने बघायला हवे, त्यांना त्यासंबधी प्रश्न पडायला पाहिजेत. विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी या संधीचा उपयोग करून नवकल्पना व गुणवत्तापूर्ण संशोधनासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.परिषदेसाठी बीजभाषक म्हणून पुणे येथील सी-मेट चे शास्त्रज्ञ डॉ.सुधीर अरबुज, साधनव्यक्ती म्हणून हिरोशिमा विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ.अकिओ किमुरा याचबरोबर शिवाजी विद्यापीठाचे प्रोफेसर व शास्त्रज्ञ डॉ. के.वाय. राजपुरे व केबीपी विद्यापीठ, साताराचे रिसर्च डायरेक्टर डॉ.एस.एच.मुजावर हे चेअर पर्सन म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा.(डॉ.) ज्ञानदेव झांबरे यांनी परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल व आंतरविद्याशाखीय संशोधनाचे महत्व विशद केले. पाहुण्यांची ओळख डॉ. एस. एच. मुजावर, डॉ. संदीप वाटेगावकर, प्रा. राजेश्वरी कामटे आणि डॉ. तृप्ती शिंदे यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा. रेश्माबानो मुलाणी यांनी केले तर आभार डॉ. शिवाजी ताटे यांनी मानले.ही परिषद ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. देश-विदेशातील ४५० हुन अधिक संशोधकांनी ऑनलाईन व ऑफ़लाइन माध्यमातून सहभाग नोंदवून जागतिक शैक्षणिक एकात्मतेचे उदाहरण घडवले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सायन्स शाखेतील सर्व विभागप्रमुख, समिती प्रमुख व समितीतील सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कार्यालयीन स्टाफ यांची मोलाचे सहकार्य लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.