श्री दत्त कारखाना शिरोळ यांची हंगामात गाळपास उपलब्ध झालेल्या संपूर्ण उसाची बिले एकरक्कमी विनाकपात आदा : गणपतराव पाटील

शिरोळ: राम आवळे
दि.१२: श्री दत्त कारखाना शिरोळ यांनी कायमच शेतकऱ्यांची ऊस बिले एकरक्कमी विना कपात आदा करून ऊस दराबाबतची विश्वासाहर्ता जोपासली आहे. यावर्षीच्या गळीत हंगामात साखर कारखान्याने 11,78,705 मे.टन उसाचे गाळप केले आहे. या हंगामात 12.35 टक्के साखर उतारा मिळाला आहे व 12,85,970 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याने कमी दिवसात जास्तीचे गाळप केले आहे.

       केंद्र शासनाच्या एफ आर पी चे धोरणानुसार कारखान्यास या हंगामात गाळपास उपलब्ध होणाऱ्या उसास प्रतिटन रुपये 3,378 देय होती. परंतु कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने गाळपास उपलब्ध होणाऱ्या उसास प्रति टन रुपये 3450 देण्याचे धोरण निश्चित केले होते. त्यानुसार कारखान्यास हंगामात गाळपास उपलब्ध झालेल्या एकूण 11,78,705 मे. टन उसाचे बिल एकूण रुपये 406 कोटी 65 लाख 32 हजार इतके शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. कारखान्याने या हंगामात गळीत केलेली सर्व उसाची प्रति टन रुपये 3450 प्रमाणे देय होणारी रक्कम 100% आदा केली आहे. अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित श्री गणपतराव पाटील यांनी दिली.कारखाना शेतकऱ्यांची ऊस शेती आर्थिक दृष्ट्या किफायतशीर व्हावी या हेतूने ऊस विकास योजनेअंतर्गत विविध उपक्रम हाती घेत असतो या उपक्रमांतर्गत सहभागी क्षेत्राची एकरी उत्पादकता सर्वोत्कृष्ट आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या उपक्रमात सहभागी व्हावे तसेच येणाऱ्या गळीत हंगामाकरिता शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस नोंद गाळपाकरता कारखान्याकडे द्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.या पत्रकार परिषदेस कारखान्याचे चेअरमन श्री रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक संचालक अनिलराव यादव, दरगु गावडे, प्रमोद पाटील, शेखर पाटील, कार्यकारी संचालक एम व्ही पाटील व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते