रत्नागिरी सिद्धेश मराठे
दि.११ उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला रत्नागिरीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पाठिंबा दिला असून सहभागिही झाले आहेत. तसेच रत्नागिरी शहरातील दुकानेही बंद करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरातील माळनाका, मारुती मंदिर, जयस्तंभ, राम आळी, मारुती आळी, गोखले नाका, बाजारपेठ परिसर आदी ठिकाणची दुकाने बंद झाली आहेत.
या बंद संदर्भात राजापूर शहरातील व्यापारी संघटनेने विरोध केला आहे. यासंदर्भात संदीप मालपेकर यांच्याशी संपर्क साधला असता कोणत्याही राजकिय पक्षांच्या बंदसाठी केलेल्या आवाहनाला राजापूर व्यापारी संघाने पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहीती त्यांनी दिली आहे.
देवरूख शहरातील परिस्थिती जाणुन घेण्यासाठी शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की या बंदला देवरुखमधील व्यापारी वर्गाने पूर्ण पाठिंबा दिला आहे. बाजारपेठ पूर्ण बंद ठेवण्यात आली आहे. देवरखवासियांनी शेतक-यांना पाठिंबा द्यायचा निश्चय केला आहे. अशी माहीती त्यांनी दिली आहे.