इचलकरंजी : हबीब शेख दर्जी
दि .२ : महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, उद्योजकांना माफक दरात जमीन व सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिल्यास उद्योगवाढीस मोठी चालना मिळेल, असा विश्वास दि. इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे यांनी व्यक्त केला.
कै. फुलचंदशेठ शहा गार्डन येथे संस्थेच्या ६६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. खंजिरे म्हणाले की, संस्थेच्या २०७ एकर जमिनीत ८५२ उद्योजकांना प्लॉट वाटप करण्यात आले असून, उद्योगवाढीबरोबरच छोट्या उद्योजकांसाठी कॉमन शेड उभारणीवर आमचा भर राहील. संस्थेचे दोन्ही पेट्रोलपंप जोमात सुरू असून त्यातून संस्थेला आर्थिक बळ मिळाले आहे. ३१ मार्च २०२५ अखेर संस्थेला ३९ लाख ४८ हजार रुपयांचा नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.
सभेच्या प्रारंभी सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन व्यवस्थापक प्रदीप पोवार यांनी केले. यावेळी सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली. आभार संचालक आनंद मालु यांनी मानले.
सभेस व्हा. चेअरमन महादेव कांबळे, संचालक सुनिल पाटील, राजू बिद्रे, उदय आदर्शे, विजयकुमार पारीख, प्रकाश नवनाळे, किरण कांबळे, सागर कोईक, सुहेल बाणदार, आदाप्पा हांडे, निलेश चंगेडीया, उमा मुरदुंडे, हसीना गैबान यांच्यासह मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.