यड्राव,:राम आवळे
दि . ३० जून२०२६: समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्शवत संदेश देत शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर तथा दक्षिण भारत जैन सभेचे मुख्यमहामंत्री अनिल बागणे यांचा वाढदिवस विविध सेवाभावी आणि पर्यावरणपूरक उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, अनाथाश्रम व वृद्धाश्रर्माना धान्यदान, तसेच नृसिंहवाडीपर्यंत पायी दिंडी अशा उपक्रमांमुळे वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची अनोखी किनार लाभली.यावेळी शैक्षणिक, सामाजिक, सहकार, राजकीय, औद्योगिक व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट घेऊन श्री. बागणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिवसभर शुभेच्छुकांची मोठी गर्दी होत होती. यावेळी दोन गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना इंजिनिअरंग पदविका शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले. त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा जबाबदारी संस्थेने घेतली.
वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कोल्हापूर, सांगली आणि सीमाभागातील विविध गावांमध्ये तब्बल २१०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. कोचन, बहावा, सीताफळ, लिंबू, फायकस, मोगरा, जास्वंद, गुलाब, कन्हेरी, एक्झोरा आणि शेवगा आदी आदी विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज परिसरात अनिल वागणे यांच्या हस्ते ‘नक्षत्र गार्डन’ अंतर्गत विविध औषधी व पर्यावरणपूरक रोपांचे लागवड करण्यात आली. शरद शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने या वृक्षारोपण मोहिमेत सहभाग नोंदविला.
रक्तदान शिविराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि नागरिकांच्या महभागातून १७५ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. यामध्ये शरद शिक्षण संकुलनातील शिक्षक, स्टाफ व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
याचबरोबर समाजातील वंचित घटकांप्रती आपुलकी व्यक्त करण्यासाठी विविध अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना धान्य व जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. बाहुबली-शांतीसागर वृद्धाश्रम, नैर्ले येथील सहारा सेवा आश्रम, अब्दुललाट येथील बालोद्यान, यड्राव येथील नवचैतन्य अनाथालय, नांदणी येथील श्रावणबाळ, निमशिरगाव येथील आई वृद्धाश्रम तसेच मिरज येथील पाठक अनाथाश्रम येथे धान्य व आवश्यक साहित्य सुपूर्द करण्यात आले. या उपक्रमासाठी शरद शैक्षणिक संकुलातील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य केले.
श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी कॉलेजपासून श्री क्षेत्र नृसिंहवाडीपर्यंत पायी दिंडी काढून दर्शन घेतले. हा उपक्रम सलग पाचव्या वर्षी सातत्याने राबविण्यात आला.