रत्नागिरी : अस्लम खान
दि.23:- भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा वारसा असणारे जुने वाडे तसेच मंदिरे आदींचे जतन होणे आवश्यक आहे. हे जतन करताना तज्ञांची मदत घ्यावी व त्याच्या मूळ स्वरुपात बदल करु नये यासाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केले.
तीन दिवसांच्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या डॉ. निलम गोऱ्हे यांनी आज लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान असणाऱ्या टिळक स्मारकास तसेच रत्नागिरी कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जतन केलेल्या कक्षास व ऐतिहासिक महत्व असणाऱ्या पतित पावन मंदिरास भेट दिल्यानंतर त्या बोलत होत्या.
टिळक स्मारक येथे असणारा वाडा जतन करण्यास रत्नागिरीत तज्ञ निश्चितपणे आहेत. या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याबाबत पुरातत्व विभागाकडून अहवाल घेतला आहे असेही त्या म्हणाल्या. त्यांनी या ठिकाणी वाड्याची पाहणी केली तसेच मेघडंबरीत असणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
टिळकांचे जन्मस्थान असणारे हे स्मारक तसेच त्यांचा पुणे येथील वाडा आणि लोकमान्य टिळकांचे चरित्र भारतातील प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. या वास्तुचे जतन करण्यात पुरातत्व खात्यास काही अडचणी असल्या तरी समन्वय आणि पाठपुरावा यातून सकारात्मक बदल निश्चितपणे होईल असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. याबाबत पालकमंत्री ॲङ अनिल परब तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना अहवाल देवू व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात याबाबत पुढील काम करु अशीही माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली.