मिरज:प्रतिनिधी
दि:३०:मे:मिरज तालुक्यातील जानराववाडी येथील लोकनियुक्त सरपंच व दुय्यम बाजार समिती मिरजचे माजी सभापती भारत हिम्मत कुंडले यांनी महाराष्ट्र शासनाच्या सुमारे पाच एकर जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून द्राक्ष बाग केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कुंडले यांचे सरपंच पद रद्द केले आहे. त्यामुळे मिरज तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यात हा सगळीकडं चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर अनेक सरपंच सुध्दा जागृत झाले आहे.
जानराववाडी ग्रामपंचायत निवडणूक 18 डिसेंबर २०२२ रोजी झाली होती. त्यामध्ये भारत कुंडले हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले होते. मात्र त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून 64 बेघरांना देण्यात आलेल्या जमिनीवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण केल्याची तक्रार संभाजी साळुंखे, सुनील बिसुरे, श्रेयसराव कुंडले यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे केली होती. त्यानुसार भारत कुंडले यांनी महाराष्ट्र शासनाच्या पाच एकर जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून द्राक्ष बागेसह इतर पिके लावल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी भारत कुंडले यांचे सरपंच पद रद्द करण्याचा आदेश दिला आहे. भारत कुंडले यांचे सरपंच पद रद्द झाल्याने अनेक शासकिय जागांवर अतिक्रमण केलेल्या सदस्यांचे पद रद्द होण्याची टांगती तलवार राहिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर तिथल्या लोकांनी सुध्दा कौतुक केलं आहे. त्याचबरोबर आपल्या पदाचा कोणी अशा पद्धतीने कोणी वापर करणार असेल तर अशा पद्धतीची कारवाई व्हायला हवी अशी देखील मिरज तालुक्यात सगळीकडे चर्चा आहे. कारवाई करण्यात आलेल्या सरपंचांनी जमीन हडपल्यानंतर तिथं द्राक्षांची काही रोप लावली होती.