मुंबई:प्रतिनिधि
दि:०७:जून:भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मोठा आरोप केला आहे. कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले असून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्याचे समोर येत आहे. यापार्श्वभूमीवर राणेंनी थेट उद्धव ठाकरेंवर आरोप केला आहे
राज्यात औरंगजेबावरच प्रेम अचानक आलेलं नाही, त्यामागे निश्चित सूत्र आहे. काही महिन्यांपासून संजय राऊत महाराष्ट्र राज्यात दंगल होणार आहे, असे बोलत आहे, तेव्हापासून हे प्रकार सुरू झाले आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी केला. या दंगलीमागे उद्धव ठाकरे मास्टर माईंड आहे का? उद्धव ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. त्यांना मोगलाईच राज्य आणायचं असेल तर स्वराज्य रक्षणासाठी आम्ही लढायला तयार आहोत, असा इशारा राणेंनी दिला आहे.
याआधी कोल्हापूरमधील मटण मार्केट, महापालिका परिसर, लक्ष्मीपुरी बाजार आणि सीपीआर हॉस्पिटलच्या मागील बाजूला दगडफेक झाल्याची माहिती आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिकांडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला असल्याची माहिती आहे.
हे सगळं कोण घडवतंय याचा विचार करायला पाहिजे. याकूब मेमन व औरंगजेबाच्या थडग्याचं सुशोभिकरण कोणी केलं. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. कोल्हापूरचा काँग्रेसचा नेता सांगतो की, दंगल होऊ शकते आणि लगेच काही जण औरंगजेबाचं स्टेटस ठेवतात. या सगळ्यांवर सरकारची नजर आली आहे. हे हिंदुत्ववादी सरकार आहे. इथं काय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही किंवा हसन मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री नाही. राज्यात एकनाथ शिंदे व देंवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई निश्चितपणे होणारच, असं राणे म्हणाले.
शिवराज्याभिषेक दिनी समाज माध्यमावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळे कालपासून कोल्हापूर शहरातील वातावरण तापलं आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवल्याच्या निषेध म्हणून हिंदुत्ववादी संघटनांकडून आज शहर बंदची हाक देण्यात आली होती. अशातच काही संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर जमावानं सुमारे 3 तासांहून अधिक काळ घोषणाबाजी केली. तसंच ‘जय श्रीराम’चा नारा देत या घटनेतील संशयितावर कडक कारवाई करावी, यासाठी आंदोलन केलं.