बीआरएसचं वादळ सोलापुरात; महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठे धक्के बसणार

सोलापूर:प्रतिनिधि

दि:२६:जुन:तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. तेलंगणामध्ये सत्ता आल्यानंतर भारत राष्ट्र समिती (BRS) महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी केसीआर यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केल्याचे पाहायला मिळत आहे

त्यानुसार केसीआर आपली आगामी काळातील राजकीय रणनीती आखत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केसीआर यांच्या गळाला महाराष्ट्रातील अनेक नेते लागले आहेत. त्यातच आज केसीआर महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज ते सोलापूरमध्ये असणार आहेत. त्यामुळे केसीआर यांच्या आजच्या दौऱ्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे केसीआर त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत एकूण 300 गाड्यांचा ताफा असणार आहे. त्यामुळे या दौऱ्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठे धक्के बसणार आहेत हे मात्र नक्की

तेलंगणातून मुख्यमंत्री केसीआर 300 गाड्यांचा ताफा घेऊन महाराष्ट्रात एन्ट्री करणार आहेत. त्यांच्यासोबत बीआरएसचे अनेक नेते हैदराबाद येथून महाराष्ट्रात येणार आहेत. त्यांच्या ताफ्यामध्ये मंत्री, आमदार, खासदार यांच्यासह मोठ्या शक्तीप्रदर्शनाच्या तयारीतच येणार आहेत.

आज बीआरएसमध्ये अनेक स्थानिक नेते प्रवेश करण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. केसीआर आज पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. याचवेळी राष्ट्रवादीचे नेते भगिरथ भालके देखील पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबतच अनेक स्थानिक नेते बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत

बीआरएसने नुकतीच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती, त्याचबरोबर त्यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफरही देण्यात आली, असं असलं तरी मात्र त्यावर पंकजांनी काही उत्तर दिलेली नाही. पंकजा मुंडे अनेक दिवसांपासून भाजपात नाराज असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. बीआरएस पक्ष महाराष्ट्रातील विविध पक्षांमधील नाराज नेत्यांना एक करण्याचं काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे.