इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१३: सत्ताधारी लोक राजकीय पक्ष, आमदार, खासदार फोडुन दमदाटीचे राजकारण करत आहेत. निवडणुका आल्या की खोटी आश्वासन देऊन दिशाभुल केली जात असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रामहरी रुपन्नावर यांनी केला. १० वर्षे संधी देऊनही शहराचा पाणी प्रश्न सुटत नसेल, मुलभूत सुविधांची वाणवा असेल तर खासदार, आमदार काय कामाचे ? असा सवाल उपस्थित करत शिव-शाहु आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करुन परिवर्तनाची लढाई बळकट करण्याचे आवाहन केले. येथील लिंबु चौकात प्रभाग क्रमांक १५ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या नारी शक्ती सभेत ते बोलत होते.
रुपन्नावर म्हणाले, शहराच्या उश्याला अनेक नद्या वाहत असुनही शहराचा पाणी प्रश्न सुटत नाही. प्रत्येक निवडणुकीत पाणी प्रश्न सोडवण्याचे अमिष दाखवुन सत्ता भोगली. त्यानंतर गेली १० वर्षे संधी देऊनही पाण्याचा प्रश्न सुटला नाही. आता पुन्हा निवडणुकीत पाणी प्रश्न सोडवण्यासाठी, विकासासाठी सत्ताधारी मतं मागत आहेत. संक्रांतीच्या योगावर निवडणुक आली आहे. त्यामुळे खोटी आश्वासन, दिशाभुल करणार्यांवर ही संक्रांत नक्की उलटणार आहे. त्यामुळे भुलथापांना बळी पडु नका, आता शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नव्या विचारांच्या, तडफदार, अभ्यासु उमेदवारांना निवडुन देण्याचे आवाहन केले.
प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांनी राजकारण हा काहींंचा उद्योग झाला आहे. नाकर्त्या खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींमुळे शहराचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत आणि धाकदपटशाहीने शहराचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे हुकुमशाहीकडे निघालेली व्यवस्था मोडीत काढण्यासाठी शिव-शाहु आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. शिव-शाहु आघाडीचे नेते सागर चाळके यांनी कर रुपाने जमा होणार्या निधीतून शहराचा विकास होणार नसेल, प्रश्न सुटणार नसतील तर त्यांची सत्ता काय कामाची ? असा सवाल करत १९९६ पासून या भागात चाळके आणि नाईक एकत्र येऊन नेतृत्व करत आहे. आता आमच्यातील दुसरी पिढी या निवडणुकीत उभी आहे. त्याला जनतेने साथ देण्याचे आवाहन केले. तसेच आम्ही दादागिरीच्या विरोधात आहे. कोण जेलमध्ये जाऊन दादा होत नाही. दादागिरी करुन नाही तर लोकशाहीने निवडणुक लढा अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रभागातील उमेदवार हिमानी चाळकेे, मंजुळा पाटील, सनी खारगे, राजवर्धन नाईक आणि संभाजी नाईक यांनी भागाच्या विकासासाठी उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. सभेस माजी नगराध्यक्षा मेघा चाळके, संकेश्वरचे माजी नगराध्यक्ष श्रीकांत हातनुरे, तम्माना कोटगी, संजय नगारे, सुशांत कोटगी यांच्यासह भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.