कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.२२: येत्या १३ सप्टेंबर ते ४ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूर येथील पोलीस परेड ग्राउंडवर सांगली,सातारा,कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील युवकांसाठी अग्नीवीर भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती संदर्भात शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आढावा बैठक संपन्न झाली.
ही भरती प्रक्रिया सुरळीत व निर्विघ्नरित्या पार पाडण्यासाठी लवकरच संबंधित विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांच्या नावे जिल्हा प्रशासनातर्फे आदेश काढण्यात येतील तसेच भरतीच्या ठिकाणी येणाऱ्या उमेदवारांच्या भोजनाच्या सोई – सुविधांच्या दृष्टीने महिला बचत गटांचे खाद्याचे स्टॉल त्या ठिकाणी उभारण्यात यावेत असे निर्देश ही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
तर या भरतीसाठी महसूल, रोजगार, पोलीस, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, अग्निशमन दल महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम त्याचबरोबर जिल्हा सैनिक कल्याण विभागामार्फत सहाय्य मिळावे अशी अपेक्षा संचालक ( ARO ) कर्नल प्रशांतसिंग यांनी बोलून दाखवली तसेच ही भरती केवळ गुणवत्तेवरच होणारअसल्याने उमेदवारांनी आर्थिक आमिषाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले.
या आढावा बैठकीसाठी सुभेदार मेजर जसविंदर सिंग, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे, करवीर प्रांतधिकारी मौसमी चौगुले, तहसीलदार स्वप्निल पवार, मनपा उपायुक्त परितोष कंकाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सरिता थोरात जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस, सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे यांच्यासह इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.