रत्नागिरी:प्रतिनिधि
दि:१:जुलै:कोकणात रत्नागिरी व रायगडमध्ये जोरदार पाऊस सुरू असून उशिरा सुरू झाल्यानंतरही पाऊस सरासरीच्या जवळ पोहोचला आहे. तिकडे दक्षिण कोकण असलेल्या तळकोकणात सिंधुदूर्ग जिल्ह्यात १५ दिवसांपूर्वीच पाऊस सुरू झाला आहे. रत्नागिरी व रायगड या दोन्ही जिल्ह्यांत मुसळधार पावसाने दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक ठिकाणी नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी घरांचं अंशतः नुकसान झाल्याच्या किरकोळ घटना घडल्या आहेत. मात्र, यंदा पावसाने रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार हजेरी लावत अगदी मोजक्या दिवसात जून महिन्याची सरासरी गाठण्याचा प्रयत्न केला आहे.
◾रत्नागिरी जिल्ह्यात १ जून ते ३० जून २०२३ या कालावधीत सरासरी एकूण ४२९.८९मिमी पाऊस झाला आहे. हेच प्रमाण गेल्या वर्षी ६४८. ७८ मिमी इतके होते. यावर्षी आतापर्यंत सर्वाधिक पाऊस हा दापोली तालुक्यात ५६७ मिमी नोंद झाली आहे तर यावर्षी आत्तापर्यंत सर्वाधिक कमी ३४८ मिमी पाऊस खेड तालुक्यात झाला आहे.
◾रायगड जिल्ह्यात याच कालावधीत एकूण ४५०.६ मिमी पावसाची नोंद झाली असून गेल्यावर्षी ३० जून पर्यंत ३०२.१ मिमी पाऊस झाला होता. यंदा गतवर्षीच्या तुलनेत जून महीन्यात पाऊस जास्त झाला असून तब्बल ६८.७% इतका पाऊस यंदा झाला आहे तर गेल्या वर्षी हेच प्रमाण ४६.१ टक्के इतके होते. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा मुरुड तालुक्यात ५६५.८ मिमी झाला आहे तर यावर्षी सर्वाधिक कमी खालापूर तालुक्यात ३३२ मिमी पाऊस झाला आहे.
◾सिंधुदूर्ग जिल्हयात ३० जून पर्यंत यावर्षी ३० जूनपर्यंत ४५९.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे तर गेल्यावर्षी सरासरी ७८५.५ मिमी पाऊस झाला होता. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा सावंतवाडी तालुक्यात ५७३.४ मिमी पाऊस झाला आहे. तर सर्वाधिक कमी ३९३ मिमी पाऊस कणकवली तालुक्यात झाला आहे
☔ यापावसामुळे रस्ते, घाट बंद पडणे, खचणे, दरडी कोसळणे, झाडे पडणे मार्ग बंद होणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान, खेडजवळ सह्याद्री खोऱ्यातही मुसळधार पाऊस असल्याने खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे.खेड तालुक्यातील जगबुडी नदीची इशारा पातळी ५ मीटर आहे सद्यस्थतीत जगबुडी नदी ५.२५ मीटरवर वाहत आहे. मात्र, खेड शहराला तूर्तास कोणताही धोका नसल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे
रायगड, पेण येथील खाडीलगत असलेले सागरी वाडी, अष्टविनायक वाडी तसेच विठ्ठल वाडी या गावातील ४७ कुटुंबातील ३०० ते ३५० नागरीकांना तात्पुरते स्थलांतर करण्यांत आले आहे. रायगड रोहा येथील कुंडलिक नदी इशारा पातळीच्या जवळून वाहत असून २२.४० मीटर पातळी असून इशारा पातळी २३ मीटर आहे. पोलादपूर येथील आंबेनळी घाट बंद असून पर्यायी असलेल्या ताम्हिणी घाटातून वाहतूक सुरू आहे. रत्नागिरी कोल्हापूर नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हा महामार्ग गुरुवारी मध्यरात्री खचला होता दोन वाहनेही अडकून पडली होती. शुक्रवारी दुपारी युद्धपातळीवर दुरुस्ती करून हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.
☔ नागरिकांच्या तक्रारीची दखल संबंधित ठेकेदाराने न घेतल्याने चिखल व मातीमुळे पावसात हा महामार्ग धोकादायक बनला आहे. खेड जगबुडीनदी इशारा पातळीवरून वाहत असल्याने खेड नगरपरिषद प्रशासन या सगळ्यावर लक्ष ठेऊन आहे.खेड तालुक्यात घेरारसाळगड गावात किल्ले रसाळगडच्या पायथ्याशी पेठ बौध्दवाडी जवळील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून हा रस्ता वहातूकीस बंद झाला आहे.चिपळूण तालक्यात पिंपळी नांदिवसे रस्ता प्रमुख जिल्हा मार्गावर झाड पडल्यामुळे वहातूक बंद झाली होती. पेढांबे अलोरे शिरगाव रस्ता प्रमुख जिल्हामार्गही अलोरे दर्ग्याजवळ झाड पडल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. यावर्षी एकंदरच उशिरा सुरु झालेल्या पावसाने कमी दिवसात सरासरी काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच नुकसानही झाले आहे