जैनापूर: राम आवळे
दि.२३ जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयातील कु. श्रावणी बाबासाहेब शिंदे हिने सादर केलेल्या "दिर्घकाळ फळे व पालेभाज्या टिकवण सेंद्रिय द्रावण" या तंत्रज्ञानाला “अविष्कार २०२३-२४” या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. याबद्दल संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते कु. श्रावणी व पालकांचा सन्मान करण्यात आला.
१६ वी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ संशोधन परिषद “अविष्कार २०२३-२४” ही स्पर्धा नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठमध्ये झाली. यामध्ये राज्यातून २३ विद्यापीठांनी सहभाग नोंदविला. संपूर्ण राज्यातून ७०६ संशोधन तंत्रज्ञान सादर करण्यात आले होते. यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे प्रतिनिधित्व कु. श्रावणी शिंदे हिने केले.हि स्पर्धा कृषि, पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, मानव जात व कायदे, वैद्यकीय व औषध विज्ञान, वाणिज्य व कायदा व्यवस्थापन या सहा विभागात भरवण्यात आली होती.कु. श्रावणी हिने कृषि विभागातून पदवी स्तरावरील स्पर्धेत कमी खर्चामध्ये सेंद्रिय पध्दतीने कोणत्याही रासायनीक विद्रव्यांचा वापर न करता जास्त काळ फळे व पालेभाज्या टिकवण्याचे तंत्रज्ञान सादर केले. या तंत्रज्ञानामुळे नाशवंत फळे व पालेभाज्या ह्या जास्त काळ टिकविल्या जाऊ शकतात. सध्या फळे व पालेभाज्या टिकवण्यासाठी ज्या पध्दती किंवा तंत्रज्ञान आहे त्यापेक्षा अधिक काळ टिकवण क्षमता व तुलनेने निम्या खर्चात हे तंत्रज्ञान श्रावणीने सादर केले आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना व ग्राहकांना जास्त फायदा होऊ शकतो असा संदेश दिला. अशा या तंत्रज्ञानाला राज्यात प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.सत्कार समारंभात बोलताना श्री. बागणे म्हणाले, प्रोजेक्ट बेसड लर्निंग हा शरद पॅटर्न आत्मा आहे. संस्थेने सन २०१२ पासून प्रोजेक्ट बेसड लर्निंग अगिकारले. त्याचा फायदा पून्हा एकदा श्रावणीच्या यशाने दाखवून दिले.या यशाने संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अभिनंदन केले. तिला प्राचार्य प्रा. एस. जे. पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. एच. फलके, मार्गदर्शक प्रा. एस. व्ही. चव्हाण सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.