जिल्ह्यातील शंभर टक्के मतदारांची नोंदणी होण्यासाठी प्रयत्न करूया

-उप जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे

कोल्हापूर, प्रतिनिधी

दि. 22 : जिल्ह्यातील कोणताही मतदार निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहू नये यासाठी शंभर टक्के मतदारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी केले.

1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी बाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी पूजा सैनी, शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाई, तहसीलदार अर्चना शेटे, महानगरपालिकेचे निवडणूक अधीक्षक सुधाकर येडू -वाढ, सहाय्यक अधीक्षक विजय वनकुद्रे, एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधीक्षक उत्तम पाटील आदी उपस्थित होते.

श्री. कांबळे म्हणाले, प्रत्येक निवडणुकीमध्ये राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात होते ही परंपरा यापुढेही सुरू राहण्यासाठी अधिकाधिक मतदारांची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. हे काम चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया असे आवाहन करून ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या अधिनस्त व अन्य महाविद्यालयांमधील नवमतदारांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना व संबंधित अधिकाऱ्यांना केले.