इचलकरंजी:
सातत्याने वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपसणार्या आचार्यश्री आनंद युवा मंच यांच्यावतीने भगवान महावीर जयंती निमित्त आणि आचार्यश्री आनंदऋषिजी मसा यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित आनंद अहिंसा सद्भावना दौड कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला. तब्बल 500 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत आर स्पोर्टस्च्या आदेश कांबळे याने प्रथम तर अनिकेत साठे याने द्वितीय आणि अरिहंत कुण्णुरे याने तृतीय क्रमांक मिळवला.
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त भगवान महावीर उत्सव मंडळाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने सद्भावना दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये लहान बालकांपासून माता-भगिनी व वयोवृध्दांचा समावेश होते. तर खास वैशिष्ट्य म्हणजे 86 वर्षीय श्री. केटकाळे यांनी स्पर्धेत उस्फूर्तरित्या सहभाग घेत स्पर्धा पूर्णही केली.
कार्यक्रमाचा शुभारंभ वर्धमान जैन श्रावक संघाचे अध्यक्ष श्रीकांत चंगेडिया, उपाध्यक्ष जीवनराज पुनमिया, मंत्री रमेश जैन, भगवान महावीर जन्म उत्सवाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, मंत्री उदय चौगुले, दिगंबर समाज अध्यक्ष गुंडाप्पा रोजे, बाळासाहेब केटकाळे, अनिल बम्मनावर आदींच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आला. स्पर्धे साठी मार्गदर्शन सहयोग सचिन खोंद्रे (रिंगण ग्रुप) यांचेकडून मिळाले. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे युवा मंत्री प्रितम बोरा यांनी स्पर्धेचा उद्देश सांगत स्वागत केले. तसेच आभार प्रदर्शन केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी आचार्यश्री आनंद युवा मंचच्या सर्व सदस्यांचे योगदान लाभले. स्पर्धेसाठी स्थानकवासी जैन युवक मंडल व महावीर मित्र मंडल यांचे सहकार्य लाभले. बक्षीस समारंभ 14 एप्रिल भगवान महावीर जयंती दिवशी सकल जैन समाजाचे मिरवणुकीनंतर नामदेव मैदान येथे होणार आहे.