इचलकरंजी –विजय मेकोटे
दि. २५ सप्टेबर :आधीच विविध संकटातून जात असताना वीज वापर आकारणी दरातील वाढ, सूत टंचाई, दरवाढ, सुताची भेसळ आणि शासनाकडे प्रलंबीत प्रश्नामुळे वस्रोद्योग मेटाकुटीला आला आहे.त्यामुळे वस्रोद्योगातील प्रश्नासंदर्भात राज्याचे अर्थ व ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक घेऊन ते मार्गी लावावेत अशी मागणी एअरजेट लूम ओनर्स असोसिएशनच्या वतीने वस्रोद्योगमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली आहे.
निवेदनात, मागील दोन वर्षात वीज वापर आकारणी दरात सातत्याने वाढ होत असल्याने एअरजेट लूमच्या कापड उत्पादनाचे मजुरीचे बिलातून जवळजवळ ६५ ते ७० टक्के रक्कम याच कारणासाठी खर्च होते. त्यातच सुताची टंचाई, सुत दरात सातत्याने होणारी दर वाढ व कापड उत्पादन मजुरीची बदलणारी पेमेंटधारा यांचीही भर पडत आहे. यामुळे कारखानदार हतबल झाला आहे. त्यातच अतिरिक्त 75 पैशाची व 5 टक्के व्याज सवलतीची न झालेली अंमलबजावणी यामुळे अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे वीज दरातील ७५ पैसे प्रती युनिट सवलतीची अंमलबजावणीकरावी, राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार प्रती युनिट 60 पैशांची दोन वेळा झालेली दरवाढ रद्द करावी, तसेच इंधन समायोजन आकारात झालेली रु.१.२० प्रती युनिट वाढ व वीज वापर बिलात सवलतीची पोकळ बाकी या सर्व प्रश्नावर राज्याचे अर्थमंत्री, ऊर्जामंत्री यांचेसोबत तातडीने सयुंक्त बैठक बोलावून सविस्तरपणे चर्चा होऊन निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे. त्यामध्ये संघटनेस सहभागी करून घ्यावे अशी मागणी केली आहे.
शिष्टमंडळात एअरजेट लूम ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजगोंडा पाटील, प्रकाश गौड, सुरेश मगदूम, अनिल कनवाडे, नरेंद्र कनोजे, प्रकाश लाहोटी, विजय पुरोहित, राजेश मुंदडा, अजित जैन, सुशील मगदूम, शरद देसाई, सुभाष बलवान, सुभाष बेलेकर, विनोद पाटणी, राजेंद्र राशिनकर, अमोल कनवाडे व कारखानदाराचा समावेश होता.