कोल्हापूर : प्रवीण भोसले
दि. १५ : श्री शाहू शिक्षण संस्थेचे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर येथे इतिहास विभाग व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट क्रांती दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भित्तिपत्रके साकारून स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाला उजाळा दिला. तसेच देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण आणि ‘ऑगस्ट क्रांती व आजचा युवक’ या विषयावर विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमामध्ये ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’, ‘जयोस्तुते जयोस्तुते’, ‘ओ देश मेरे’, ‘बलसागर भारत होवो’, ‘उंच उंच गगनात तिरंगा’ आदी देशभक्तीपर गीतांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. देविका शेंडगे, गुंजन खुर्दाळे, साक्षी, सृष्टी, प्रलशा कांबळे, कोमल, अभिषेक कोळी, यशराज, मयुरी, समीर, ओंकार बामनकर आणि कौशिक शिंदे या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन मा. मानसिंग दादा बोंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी ९ ऑगस्ट १९४२ रोजी झालेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले. स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या त्यागातून आजच्या युवकांनी देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास IQAC समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, सहसमन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे, स्टाफ सेक्रेटरी डॉ. के. एम. देसाई, प्रबंधक श्री. रवींद्र भोसले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन इतिहास विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे क्रांती दिनाचा कार्यक्रम देशभक्ती, इतिहासाची जाणीव आणि राष्ट्रनिष्ठेने भारलेला ठरला.