संजय घोडावत यांचा आचार्य श्री दर्शनसागरसूरीश्वरजी पुरस्काराने गौरव
कोल्हापूर:रेणू पोवार
दि .२५ : समाज सेवा हे एक व्रत आहे, असे मानून जैन व इतर समाजाची मनोभावे सेवा केल्याबद्दल मुंबई येथे नुकताच संजय घोडावत यांचा आचार्य श्री दर्शनसागरसूरीश्वरजी पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.श्री अविघ्न इस्टेट, श्री मुनीसुुव्रतस्वामी श्वे. मू. पू.जैन संघ व चातुर्मास व्यवस्था कमिटी यांच्याद्वारे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संजय घोडावत यांनी कोल्हापूर आणि परिसरात राहून स्थानिक ते आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. मिठापासून ते विमानापर्यंत विविध क्षेत्रात उद्योगांची उभारणी केलेली आहे. तसेच संजय घोडावत शिक्षण संकुलाची स्थापना केली आहे.यामध्ये संजय घोडावत विद्यापीठ, इंटरनॅशनल स्कूल, पॉलिटेक्निक,आयआयटी व मेडिकल अकॅडमी सुरू केली आहे. येथे 21 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. उद्योग व शिक्षण क्षेत्रातून 10 हजार रोजगार निर्मिती झाली आहे. तसेच 3 हजार स्टार लोकल मार्ट उभारण्यात येणार आहेत. यामधून 25 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. सोशल फाउंडेशन द्वारे सामाजिक कार्यात घोडावत ग्रुप नेहमीच अग्रेसर राहिले आहे ज्यामध्ये दिव्यांगांसाठी शाळा, पूरग्रस्त, अनाथालय,दुष्काळग्रस्त शेतकरी, वृद्धाश्रम, शहीद जवानांचे कुटुंब, आरोग्य केंद्र, सेवाभावी संस्था, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू यांना मदतीचा हात पुढे करून सामाजिक भान जपले आहे.
आचार्य श्री तुलसी ब्लड बँकेची स्थापना करून अनेक रुग्णांना रक्तदानातून जीवदान दिले आहे. ग्रामीण भागातील मुलींसाठी फाउंडेशन द्वारे कन्या महाविद्यालयाची स्थापना केली आहे. सामाजिक कार्याबरोबरच शाश्वत विकासासाठी 3 लाखांच्या वर फाउंडेशन च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे. वायनाड जिल्ह्यातील विनाशकारी भूस्खलनग्रस्तांना फाउंडेशनच्या वतीने 11 लाखांची मदतही करण्यात आली आहे.
संजय घोडावत यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.