मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचा १०० टक्के निधी खर्च करून नियोजित विकासकामे पूर्ण करावीत:मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई: प्रतिनिधी

दि.१०: मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या अखर्चित निधीचा विनियोग करून नियोजित विकासकामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

     विकासासाठी मिळालेला एकही रुपया अखर्चित राहता कामा नये, लोकाभिमुख कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने गतीने हालचाली कराव्यात, तसेच अतिरिक्त निधीसाठी लागणारा आवश्यक पाठपुरावा शासन स्तरावर तातडीने केला जाईल,असे मंत्री नितेश राणे म्हणाले.विभागाला प्राप्त झालेला निधी अखर्चित न ठेवता तो १०० टक्के खर्च करून मच्छिमार बांधवांच्या हिताच्या आणि बंदरांच्या विकासाच्या योजना मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. आर्थिक वर्षाच्या उर्वरित काळात विभागाकडील उपलब्ध निधीचा शंभर टक्के वापर करून सर्व प्रलंबित विकासकामे पूर्ण करावीत. राज्याच्या किनारपट्टीचा विकास आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील आधुनिकतेसाठी आगामी काळात अधिक निधीची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी शासनस्तरावर तातडीने पाठपुरावा करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी यावेळी दिले.या  बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  पी. प्रदीप, पदुम (पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय) विभागाचे सचिव  एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.