विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ : ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे  

मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण  

  सांगली: अय्यान पटेल

दि.१२: मिरज तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि जलद शासकीय सेवा उपलब्ध होतील. उर्वरित कामे व विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आज केले.

            मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री व आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, माजी आमदार दिनकर पाटील, मिरजचे प्रभारी गटविकास अधिकारी किरण सायमोते, सहायक गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मडके आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

            मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण झाल्याचे जाहीर करून ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, प्रत्येक बेघराला घरकुल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेऊन शासनाने एका वर्षात जवळपास 30 लाख घरकुले मंजूर केली. त्यातील साडेसहा लाख घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. घर बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देणे किंवा ते शक्य नसेल तर जमीन उपलब्धतेसाठी एक लाख रूपये, प्रत्येक घरावर सोलर पॅनल अशी विकास कामांची भूमिका घेऊन राज्य शासन विविध निर्णय घेत आहे. सांगली जिल्ह्यात 42 हजार घरकुले मंजूर असून त्यापैकी 18 हजार घरकुले बांधून पूर्ण आहेत. याचबरोबर मिरज तालुक्यातील विविध तीर्थक्षेत्रांचा दर्जा उन्नत करून कोट्यवधी रूपयांचा निधी तीर्थक्षेत्र विकासासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माध्यमातून आपल्या समृध्द संस्कृतीचा वारसा जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्यातील विविध महामार्गासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

            ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, आधुनिक कार्यालयीन सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम अधिक गतिमान होईल. मिरज पंचायत समितीच्या जोड इमारत व अन्य उर्वरित कामासाठी लागणारा जवळपास सव्वा आठ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच पंचायत समितीच्या जुन्या इमारतीची दुरूस्ती व सभागृहाचे नूतनीकरण करण्यात येईल. राज्य शासन विविध विकास कामासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठीशी असून मिरज तालुक्यातील विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानामध्ये सांगली जिल्ह्याने केलेल्या कामाचे कौतुक करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

            आमदार डॉ. सुरेश खाडे म्हणाले, राज्य शासन सर्वसामान्य जनता व बळीराजाच्या हिताचे निर्णय घेत असून 2 लाख रूपये पर्यंतची सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर म्हैसाळ योजनेच्या थकीत वीज देयक प्रकरणी सकारात्मक निर्णय घेऊन योजनेचे पाणी दुष्काळी भागाला देण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास होणार आहे. तसेच तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य शासनाने भरीव निधी दिला आहे. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या माध्यमातून एकाच छताखाली नागरिकांना विविध सेवा सुलभपणे उपलब्ध होतील असे सांगून त्यांनी नवीन जोड इमारत, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरण व अन्य कामांसाठी आवश्यक सव्वा आठ लाख रूपये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यावेळी केली.

            आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी पाणंद रस्ते योजना, लाडकी बहीण योजना, विविध महामार्ग अशा अनेक जनहिताच्या निर्णयांचा दाखला देऊन तळागाळातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम शासन करत असल्याचे सांगितले.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, बजरंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कोनशीला अनावरण व प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली.प्रास्ताविक प्रभारी गटविकास अधिकारी किरण सायमोते यांनी तर ज्ञानेश्वर मडके यांनी आभार मानले. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले.

            प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास महापालिकेचे गटनेते निरंजन आवटी, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, पृथ्वीराज पाटील, अरविंद तांबवेकर, आमदार सुरेश खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमन खाडे, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन पंचायत समिती प्रशासनाने केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.