मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम करताना स्थानिकांना विश्वासात घ्या-पालकमंत्री उदय सामंत

 

रत्नागिरी दि.21:- मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेवून काम करावे अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित विभागांना दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

बैठकीला जिल्हा‍धिकारी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. ओटवणेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते.

मिऱ्या नागपूर महामार्गाचे काम करत असताना कुवारबाव बाजारपेठेला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.  बाजारपेठेतील दुकाने सद्यस्थितीप्रमाणेच राहतील. बाजारपेठेच्या ठिकाणी उड्डाणपुलाच्या खालून जाणारा अंतर्गत रस्ता तयार करण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.  ज्या नागरिकांच्या जमिनी महामार्गाकरीता संपादित केल्या जाणार आहेत त्यांना त्याचा मोबदला लवकरात लवकर देण्यात यावा असेही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.यावेळी कुवारबाव बाजारपेठेतील नागरिक उपस्थित होते.

राष्ट्रीय जलजीवन मिशन

पालकमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रीय जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामाचा आढावा घेतला.  या योजनेतंर्गत मंजूर नळपाणी योजनेची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

विविध विकासकामांचा आढावा

आज पालकमंत्री उदय सामंत यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला.  यामध्ये मुख्यमंत्री सडक योजना, जनसुविधा, नागरी सुविधा, टंचाई आराखडा आदी विषयांचा आढावा घेतला.  रस्ता दुरुस्ती व डांबरीकरणाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.  येत्या पंधरा दिवसात टंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार करावा. रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील सुशोभिकरणाची कामे पूर्ण करावीत.  अशा सूचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.  जिल्ह्यात बचत गट विक्री केंद्र जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.