खरीप हंगामासाठी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा आवश्यक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई: प्रतिनिधी
दि.११: खरीप हंगामासाठी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा ठेवण्याचे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. खरीप हंगाम 2026 मध्ये युरिया आणि डीएपी खतांचा संरक्षित साठा मंजूर करण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक पार झाली. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संभाव्य मागणी, पुरवठा साखळीतील अडचणी आणि शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध होण्याची गरज यासंदर्भात सविस्तर आढावा घेतला.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, युरिया आणि डीएपी ही खते शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी आहेत. पेरणीच्या तसेच उभ्या पिकांना दुसरा हप्ता देण्याच्या काळात मागणी वाढते. रेल्वे वाहतूक, आवंटन, आयात किंवा उत्पादनातील तांत्रिक कारणांमुळे पुरवठा विस्कळीत झाला तर शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तुटवडा जाणवू नये, यासाठी आधीच संरक्षित साठा ठेवणे गरजेचे असल्याचे कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले.जून-जुलै या उच्च मागणीच्या महिन्यांत पुरवठा कमी झाल्यास तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक नियोजन करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना योग्य वेळी खते मिळाली पाहिजेत, हीच शासनाची प्राथमिकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.या बैठकीस कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.