पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीसाठी आय.एम.आय.एस प्रणालीत पूर्ण माहिती भरावी : पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई: प्रतिनिधी
दि.९: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सहा गावांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित गावामधील योजनांची कामे पूर्ण क्षमतेने चालू आहेत, तसेच योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी आय.एम.आय.एस (इंटिग्रेटेड मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम) प्रणाली मध्ये पूर्ण माहिती भरावी, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जल जीवन योजनेच्या कामांबाबत मंत्रालयात श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर), पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन – नैनुटीया, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव श्रीरंगा नायक, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे, पुणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्या वैशाली आवटे, कोल्हापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता डी. के. पाटील, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे, उपअभियंता एस.एस.लोहार उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन या दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाल्या होत्या.
श्री. पाटील म्हणाले की, शिरोळ विधानसभा मतदारसंघातील १५ नळ पाणीपुरवठा योजना तांत्रिक कारणांमुळे हस्तांतरित झाल्या नाहीत. त्यापैकी एका गावच्या नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत महावितरणचे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्ताव सादर करावा.यावेळी जल जीवन मिशन कार्यक्रमातील शिरोळ तालुक्यातील हरोली, नांदणी आणि यड्राव नळपाणी पुरवठा योजनेचा आढावा घेऊन मंत्री पाटील यांनी नवे दानवाड नळ पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव पाठवावा, तसेच लोकप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी, असे निर्देश दिले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.