संजय घोडावत विद्यापीठात ‘दिलखुलास विथ नाना पाटेकर’ नाविन्यपूर्ण व प्रबोधनात्मक मार्गदर्शनाने विद्यार्थी मंत्रमुग्ध

कोल्हापूर :सलीम मुल्ला 

दि.१९ : संजय घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘दिलखुलास विथ नाना पाटेकर’ या प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात अभिनेते व समाजसेवक नटसम्राट नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना विचारांची नवी दिशा दिली.कार्यक्रमाची सुरुवात नाना पाटेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विजयचंद घोडावत, राजेश घोडावत, राकेश घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे, इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका मोहंती मॅडम, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, अकॅडमी डीन, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


याप्रसंगी प्रशांत कुलकर्णी आणि पंकज मेहता यांच्या ‘शब्द पंख’ प्रकाशनाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रस्ताविकात चेअरमन संजय घोडावत यांनी नाना पाटेकर यांच्या अभिनय कारकिर्दीबरोबरच ‘नाम फाउंडेशन’ च्या माध्यमातून केलेल्या समाजसेवेचा गौरव केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका घेत नाम फाउंडेशन बरोबर  कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या  प्राथमिक शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संजय घोडावत विद्यापीठ आवश्यकते  सहकार्य करेल , अशी ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. विराट गिरी  यांनी नाना पाटेकर यांच्या जीवनप्रवासाचा विश्वनाथ पाटेकर ते नटसम्राट नाना पाटेकर प्रेरणादायी परिचय करून दिला. मार्गदर्शनात नाना पाटेकर यांनी विद्यार्थ्यांना थेट आणि प्रामाणिक शब्दांत जीवनदृष्टी दिली. “माहिती म्हणजे ज्ञान नाही,” असे सांगत त्यांनी सोशल मीडियावर अवलंबून न राहता अभ्यास व जीवनाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला. उपलब्ध सुविधांची जाणीव ठेवून जगावे, स्वावलंबी व्हावे, जाती-धर्म-राजकारण यांचा अभ्यास देशहितासाठी करावा, गरज वाटेल ते काम निर्भयपणे करावे, असे त्यांनी ठासून सांगितले. “मरणावर विश्वास ठेवला की जगणं सुंदर होतं,” आत्मपरीक्षण केल्यास जीवनाला दिशा मिळते, आपली ओळख भारतीय म्हणून अभिमानाने जपा, आणि देश समृद्ध करण्यासाठी मनापासून काम करा अशा ठळक संदेशांनी त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. “संजय घोडावत शैक्षणिक  संकुलना मध्ये शिक्षण घेत असणारे विद्यार्थी हे नक्कीच देश हिताची कार्य करतील असे गौरव उद्गार नाना पाटेकर यांनी काढले”
लहानपणीच्या आठवणी त्यांच्या भारदस्त आवाजात ऐकताना प्रांगणातील  उपस्थित मंत्रमुग्ध झाले. देशविरोधी विचारांना ठामपणे विरोध करा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सारख्या गंभीर प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहा, आणि स्वतःवर प्रेम करा, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोहन तिवडे यांनी तर आभार विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे यांनी मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.